Thursday, 12 June 2014

माझा गुरु हरवलाय !



गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू …… हा श्लोक शाळेत असताना म्हणायचो तेव्हा 'आई - वडील, शाळेतल्या एखाद्या आवडत्या बाई, तबल्याचे सर, पेटी शिकवणाऱ्या काकू, कुणीतरी डोळ्यासमोर यायचं. पण कोलेजात गेलो तेव्हा पासून असलं सगळं बंद झालं. 
एक तर हा श्लोक किती वर्षात म्हणलाच नाही , आणि म्हणलाच तेव्हा डायरेक्ट 'ब्रह्मा' किंवा 'विष्णु' या व्यतिरिक्त कुणी दिसलंच नाही. 

दहा वर्ष झाली , कुणाचे पाय धरावे असं कुणीच सापडलं नाही ?? …. मनाला पटत नाही . कदाचित मोठ्या झालेल्या आमच्या शरीराला कुणाचे पाय पकडण्याचा मनाचा मोठेपणाचा विचार मानवला नसेल . आई वडील , घरातले वयस्क ह्यांपैकी हक्काच्या (ज्यांना सुभाषिता मध्ये गुरु म्हणलय ते हक्काचे) गुरूंना सुद्द्धा आपण गेल्या दहा वर्षात किती वेळा साधा नमस्कार केला , ते आठवावं लागेल . आपली पिढी वाया गेली , आपला खूप चुकलं असा मी अजिबात म्हणत नाही , पण कुणाचे पाय धरले असते तर जास्त समाधान वाटलं असतं असा विचार तिशीच्या उंबरठ्यावर मनाला चाटून जातो इतकंच !

खास करून संगीतामध्ये, खेळात काही छान करणारी मित्र मंडळी अशा लोकांना बघून जाणवतं कि एखाद्या क्षेत्रातले गुरु सुद्धा शिष्याच्या संपूर्ण आयुष्यावर कसा प्रभाव पाडतात . काय आणि का असतो हा प्रभाव नक्की ??

पुस्तकी व्याख्येप्रमाणे : "आपल्याला आपला शिक्षण, त्यातून मिळणारं कौशल्य , नंतर त्यातून मिळणारी नोकरी आणि पैसा ह्या गोष्टी एक 'माध्यम' पुरवत असतात , जगण्यासाठी एक 'साधन' पुरवत असतात . पण 'साध्य' नाही ! आपल्याला कोणतीही गोष्टी कशी हवी आहे , कशी मिळणार आहे , ह्याचा DNA ह्या माध्यमातून व्यक्त होत असतो. पण आपल्याला 'काय' सध्या करायचंय ह्या गोष्टीचा विचार गुरु सोबत जास्त परिपक्व होत जातो . 'गुरुसारखं बनायचं' हि एक सुप्त इच्छा  'कसं बनायचं नाही' ह्याची सूत्र सुद्धा पक्की करून घेत असते आणि तेच म्हणजे आयुष्यातलं 'साध्य' . ते पक्क असलं , कि मग इतर अनेक गोष्टी मिळाल्या नाहीत , तरी समाधान नक्की मिळतं आणि मनाची चलबिचल होत नाही . "

पण मला इतका अवघड कळत नाही . इतकंच कळतं कि मनात खूप गोंधळ झाला तर पटकन १० मिनिट जाउन मन मोकळं  करता येईल आणि त्या १० मिनटातून उपाय शोधेल अशी व्यक्ती मी हरवून बसलोय . आई वडील हे सर्वोच्च गुरु असतातच , थोडक्यात सुप्रीम कोर्ट ! पण त्या कोर्टात जाण्या आधी मार्गदर्शक , मित्र , बंधू , हित चिंतक , निंदक असलेला गुरु मात्र मी हरवलाय . 

अनिल अवचटांची एक गम्मत सांगतो . त्यांना वयाच्या पन्नाशीत भूगर्भ शास्त्र शिकायची हुक्की आली . आता कसं शिकणार  ?? एवढ्या मोठ्या माणसाला विद्यापीठात प्रवेश घेऊ देईनात , मानानी असलेलं मोठेपण कुणाला प्रश्न विचारू देईना , पुस्तकं वाचली तर काही कळेना …. मग त्यांचे एक जवळचे मित्र डॉ. करमरकर प्रसिद्ध भूगर्भ शास्त्रज्ञ होते . त्यांच्या घरी दुपारी चहाला गेले आणि म्हणाले, "मी तुमच्याकडे रोज दुपारी १ तास येईन , तुम्ही गप्पा न मारता मला Geology शिकवा . आणि पुढे २ वर्ष त्यांच्या सोबत वाटेल तिथे फिरत राहिले आणि पुष्कळ ज्ञान मिळवलं. कधी ते ओरडले , कधी चिडले , कधी वैतागले , पण अवचटांनी अजिबात त्याचा राग मानला नाही आणि चिकाटी सुद्धा सोडली नाही. तुमच्या एखाद्या जिवलग मित्राला गुरु बनवून त्याकडून शिकण्याचा धाडस आहे आपल्यात ??? बोलताना सोप्पं वाटतं , पण मित्रांसमोर कमीपणा घ्यायला ५६" छाती लागते . 

अनिल अवचट , पु. ल. ,सलील कुलकर्णी , व्यंकटेश माडगुळकर अशा संवेदनशील लोकांची चरित्र वाचून असा दिसतं कि त्यांना वयाच्या साठीत सुद्धा कुणाचे पाय पकडण्यात कमीपणा वाटला नाही . बघूया , आपल्याला हे समाधान मिळतंय का "समोर कोणी का असेना , मी कोणाचंच आयुष्यात कधी ऐकलं नाही" हे म्हणण्यात आपण समाधान वाटून घेणारे ते !!!

हर्षद 

No comments:

Post a Comment