संपूर्ण ध्येयवाद आणि विशिष्ट ध्येयवाद !
(गेल्या १० वर्षात लग्न झालेल्या सर्वांसाठी )
हल्ली आपण मुलांना आय पॅड वापरायला शिकवतो , जोय स्टिक वापरायला शिकवतो , कधी कधी शुभं करोति सुद्द्धा शिकवतो . पण ध्येयवाद ह्या नावाखाली येणारं काही शिकवतो का हे जरा बघूया . हि काही फार मोठी गोष्ट नाही बर का ! रोजच्या जीवनात करायच्या किंवा न करायच्या गोष्टींची एक सूची म्हणजे ध्येयवाद , असं प्रबोधिनीत शिकवलेलं मला आठवतं . संपूर्ण ध्येयवाद म्हणजे स्वत्व विसरून संपूर्ण आयुष्य कोणत्या तरी (निस्वार्थी) ध्येयाला अर्पण करणे …! हा प्रकार स्वातंत्र्य मिळाल्यावर इंग्रजांसोबत भारत सोडून गेला आणि त्याची आजच्या काळात मुलांना घडवताना गरजहि नाही . पण विशिष्ट ध्येयवाद हा मात्र कालातीत असतो. आणि म्हणलं तर सोप्पा , म्हणलं तर अति अवघड असतो. कधीच खोटे बोलू नये , कधीच चोरी करू नये , दारू काधिहि पिऊ नये , वगैरे सोप्प्या पण आजच्या काळात करायला जड जाणाऱ्या गोष्टी म्हणजे विशिष्ट ध्येयवाद ! आपल्या आई , वडिलांनी आजी आजोबांनी आपल्याला हेच शिकवलं कारण ह्या गोष्टी त्यांनी कधीच केल्या नव्हत्या आणि अश्या लहान लहान पण महत्वाच्या गोष्टीतला विशिष्ट ध्येयवाद त्यांनी अचूक पाळला होता . आपण आपल्या मुलांना फार फार तर "शक्यतो खोटे बोलू नये" , "शक्यतो चोरी करू नये" , "दारू कधीकधीच प्यावी" इतपतच सांगू शकतो कारण इंटरव्यू ला का होईना , आपण खोटं बोललो आहोत , proxy मारून का होईना , अर्ध्या दिवसाची रजा कधी न कधी चोरलेली आहे . mocktail मधून का होईना , दारू पिलेली आहे . मग हे सगळं आपल्या मुलांना आजच्या (आणि २० वर्षानंतरच्या ) काळात करावं लागणार हे आपल्याला माहीतच आहे . मग अशी कोणती एकतरी गोष्ट आहे कि जी आपण पुढच्या पिढीला ठणकावून सांगू शकतो ?? जरा विचार करुया. आता ध्येयवाद नसला तर काय नुकसान होतं ?? बहुतेक काही नहि. पण जर असला , तर मात्र काहीतरी फायदा नक्की होत असतो . जगात ८५ % लोक दारू पितात , तर दारू का पिऊ नये ? आणि ती का वाईट ?? ……माहित नाही . पण महत्वाचं हे हे आहे कि दारू हे (भारतात तरी ) मोहाचं प्रतीक आहे. आणि ती न पिणं हे आपल्याला मोह टाळण्याची शिकवण देत असतं . दारू पिउन संसार उध्वस्त झालेली अनेक उदाहरणं आहेत , पण ओठाशी आलेला ग्लास चव न घेता खाली ठेवल्यामुळे वाचलेले संसार कसे मोजणार ???
आपली आई उपास करायची . आजही करते . आपण बाबांसोबत त्याची कधी कधी चेष्टा सिद्ध केली असेल , कधी तिला पित्त झाल्यावर प्रेमानी रागावलो सुद्धा असु. पण आईनी उपास करायचा सोडल्याचं उदाहरण फारच कमी . त्यांनी काय पुण्य मिळतं ? माहित नाही . पण एक गोष्ट आपण आयष्यात ठरवली आणि ती वाट्टेल ते झालं तरी पाळली ह्यचा समाधान मात्र प्रचंड मिळतं. हा सुद्द्धा एक विशिष्ट ध्येयावाद्च ! आपण स्वतः अशी कोणती गोष्ट करतो हे स्वतःलाच विचारून बघूया . लक्षात घ्या , ह्याचा आपल्या आयुष्यात जेवढा फायदा होतो , तेवढाच देशाला सुद्धा नकळत होत असतो .आपल्यापैके अनेक जण जपान , जर्मनी , इंग्लंडला जाऊन आले असतील . त्या देशातले लोक कुठली गोष्ट कटाक्षांनी पाळतात का , त्यांच्यामध्ये विशिष्ट ध्येयवाद आहे का हे जरा बघितला तर असं लक्षात येईल कि "हो" , प्रत्येक देशाची एक विशिष्ट गोष्ट आहे जी त्या देशाचे बहुतेक सर्व नागरिक जपतात , त्याचा विशिष्ट ध्येयवाद बनतो आणि त्या सामुहिक ध्येयवादाच रुपांतर देशप्रेमात होतं . थोडक्यात , दिलेली वेळ पाळणं हा जर्मन लोकांचा गुण सर्वश्रुत आहे . "मी कधीही वेळेचा अपमान करणार नाही , आणि सगळीकडे वेळेतच जाईन " असं एक नाही , दोन नाही , …। सर्व जर्मन माणसांनी ठरवल्यावर आणि तसा अनेक पिढ्या केल्यानंतर त्या देशाच्या लोकांनी देशाची प्रतिष्ठा ह्या एका विशिष्ट बाबतीत ऊच्च दर्जाला नेउन ठेवली . आणि नकळत त्याचा देशाच्या विकासात प्रचंड फायदा झालाच . इंग्लिश लोकांची शिस्त , जपानी लोकांची काम करायची चिकाटी हे सर्व गुण वैयक्तिक पातळीवर ठरवलेल्या विशिष्ट ध्येयवादाचं एकत्रित रूप आहे .
आपल्या पिढीबद्दल बाहेरच्या देशातल्या लोकांची मतं काय आहेत हे मी कुणाला सांगण्याची गरज नाही . पण आपण स्वतः कोणता ध्येयवाद आचरणात आणतो , आपल्या मुलांना कोणता ध्येयवाद शिकवतो , आणि तसा सर्वांनी केल्यावर २० वर्षांनी आपली पुढची पिढी कशी वागते , ह्यावर देशाचा विकास काही प्रमाणात नक्कीच अवलंबून आहे . आपल्या पिढीतल्या धडाडी , नवीन शिकण्याची आस , कुठल्याही परिस्थितीत काम करायची तयारी अश्या काही चांगल्या गोष्टी पुढे नेउन सामाजिक उदासीनता , डोळ्याला झापड लाऊन चालायची वृत्ती , बेशिस्त वगैरे वाईट गोष्टी टाकून देऊन पुढच्या पिढीत जर कुठला लहानसा ध्येयवाद जरी पेरू शकलो तरी भारतीयांकडे बघण्याच्या दृष्टीकोनात बाहेरील देशांमध्ये बराच फरक पडेल . आणि आपल्यालाच त्याचं खूप समाधान मिळेल . आपल्याला जे मिळाला नाही (आणि तरी आपलं फार नुकसान झालं नाही ) ते मुलांना देण्याच्या प्रयत्नात आपण त्यांना बराच काही चांगलं नक्की देत आहोत , पण त्यासोबत आपल्याला जे मिळालं (आणि ज्याचा आपल्याला खूप फायदा झाला ) ते मुलांना द्यायचं राहून तर जात नाही न , एवढ बघितलं तरी ध्येयवादाचं बीज आपण त्यांच्यात पेरलं असा मला वाटतं !
No comments:
Post a Comment