Sunday, 22 September 2024

चौक

 चौक 




आयुष्य समृद्ध करणाऱ्या मित्र, गुरू, पुस्तकं, साधना अशा अनेक कलात्मक, गुणात्मक, प्रगल्भ वगैरे गोष्टी आहेत त्यात माझं पामराच आयुष्य समृद्ध करणारी एक साधी सोपी जागा म्हणजे चौक! 


कुठलाही, कोणत्याही शहरातला, गावातला, स्टेशन बाहेरचा, एस. टी. स्टँड जवळचा, मंडईतला संध्याकाळी जगबजलेला आणि १२ वाजता सूम् शांत होणारा, हाजी अलीच्या जागतिक कीर्तीच्या चौका पासून ते वरली आळी आणि १० वी गल्ली या निनावी गावातले रस्ते जोडणारा ! 


कूर्ग ला हत्तींच्या कळपावर रिसर्च करताना नगरहोळ जंगल आणि विराजपेत नावाचं टुमदार खेड यांना जोडणारा फाटा मी जवळपास सहा महिने अनुभवला. त्यात एक कळकट्ट डोसेवाला, एक मिक्सर दुरुस्त करणारं दुकान आणि एक मण्यांची माळा विकणाऱ्या काकुचं टेबल याशिवाय कोणतीही गजबज नसायची. पण, तिथे चालत एक फेरफटका मारल्याशिवाय झोप लागत नसे. आणि चुकून लवकर गेस्ट हाऊस laa पोचलो तर चुटपुट लागायची. 


तशीच गाथा कोल्हापूरच्या सम्राट हॉटेल बाहेरच्या चौकाची. २००७ साली तिथे रात्री ११ नंतर कोंडुस्कर च्या २ बसेस निघायच्या, हे सोडून काहीही घडायचं नाही. पण त्यांचा मागमूस ठेवायची जबाबदारी असल्या सारखं आम्ही एक चक्कर टाकून "दादर बस अजून गेली नाही, कमाल आहे" असं म्हणत घरी यायचो.


या सगळ्याची आठवण यायचं कारण मी सध्या अनुभवत असलेला धरमपुर चां चौक! हा एक प्रशस्त, शिमला राष्ट्रीय महामार्गावर चा तिठा. एका बाजूला खोल दरी, दुसऱ्या बाजूला त्यापेक्षा खोल दरी आणि त्या दोन्ही मध्ये असेलल्या एका लहानशा टेकाडावर चढत वसलेलं धरंपुर. पुलंच्या अफजलखानाच्या चित्रा सारखं इथे सगळं आहे... भाजीवाले, टॅक्सीवाले, मेडिकल स्टोअर, बस स्टॉप, रेल्वे स्टेशन, राम मंदिर, गुरुद्वारा, पूल, लांब दिसणारा हिमालय, खाली लांब कधी कधी दिसणारं चंदीगड शहर, दिवे, शेत, कॅफे, ढाबा, ३ स्टार हॉटेल, बँक, आमचा चहावाला पंकज, गरम जिलेबी तळणारा जगदीश, दारूचा ठेका... 


पण मला मोबाईलचां चार्जर हवाय तर जायला लागतं २० km लांब सोलन ला !

अशा गमतीदार चौकात काहीही काम नसताना देखील संध्याकाळी एक चक्कर मारल्याशिवाय दिवस सार्थकी लागत नाही.  गेले सहा महिने मी इथे सेटल व्हायचं ठरवतो आहे तेव्हा इथे येताना घरातून बाहेरगावी आल्यासारखं वाटायचं. आणि आता इथून जायचं ठरवल्यावर काल पहिल्यांदा इथून येताना बाहेरगावाहून घरी आल्यासारखं वाटलं ! असो, हे मनाचे खेळ माझ्या साठी नवीन नाहीत. अक्षरशः १२ गावातल्या २२ चौकांच्या इमोशनल मगरमिठीतून सुटका करून घेतलेला संताजी आहे मी, मला धारंपुर चां चाय सूत्ता काय थांबवेल?


पण मुद्दा असा आहे की मन मोकळं करायला, समृध्द करायला, शिकवायला, घडवायला आपण ज्याच्याशी खांद्यावर हात टाकून बोलू शकतो, टाळी देऊन हसू खिदळू शकतो असा मित्रच हवा का ?? असे अनेक चौक अनेक स्वरूपात माझ्या जवळ आहेत, ज्यांच्या फक्त असण्याच्या भावनेने मला परिपूर्ण वाटतं, आणि त्यांनी माझ्याशी त्यांच्या मनातलं सांगायची गरज, प्रत्यक्ष भेटण्याची ओढ, शब्दांनीच व्यक्त होण्याची आशा, स्पर्शाने समजून घेण्याची ताकद नसते.


मला मात्र पाँडिचेरी च गांधी statue, शिमल्याच्या RIDGE, साताऱ्याच्या राजवाडा, पुण्यातला लिनाचीम, अगदीच नवीन जन्मलेल्यांसाठी LMD, असे अनेक लाडके, कधी काळी तिथं राहिल्यामुळे रोजच्या जीवनाचा भाग झालेले आणि आपलेसे होऊन आता भूतकाळातल्या आठवणीत फिट्ट जाऊन बसलेले चौक मानवी रुपात जिवलग बनून भेटत राहतात आणि तशाच आपुलकीच्या आणि तटस्थ नात्याने अजुन समृध्द करत राहतात...!

वणवा

कालच्या विचारांना लागला वणवा 

अर्धवट करपले बरेच,

न करता विचार की हवे कोणते, नको कोणते 

भस्मसात झाले बरेच,


नव्या विचारांच्या बिया सांडल्या मनभर 

रुजले नवे रोपटे अनेक,

अंकुरले अचानक काही कोंब

भलतेच तरारले अनेक,


नसता लागला वणवा तर बरं,

म्हणाले जुने खरेच,

वणव्या शिवाय आपलं खरं नव्हतं 

म्हणाले नवे खरेच,


जुन्याचा मागमूस नाही नव्यात

नव्याचा गंध नव्हता जुन्यात 

म्हणाले बरेच, म्हणाले बरेच !!!

अपेक्षा

 अपेक्षा 


वनवासातही राम तसाच होता, अयोध्येतही तसाच 

प्रेमळ

महालातील सीताही तशीच होती, पर्णकुटीतही तशीच

शांत 

प्रेमळ रामाने, शांत सीतेला हरीण आणावं अशी अपेक्षा आली 

तेव्हा रामायण झालं 


आम्ही कालही तसेच वागलो, उद्याही तसेच

मनस्वी

जगाने कालही तेच केलेत, आजही तेच करणार

तेजस्वी

मी तेजस्वी, आणि जगाने मनस्वी वागायची अपेक्षा आली,

की महाभारत होणार !


गावकरी आधीही तसेच राहिले, आणि नंतरही तसेच

अजागळ

साहेब आधीही तसाच होता, अन् नंतरही तसाच

बिलंदर

बिलंदर प्रश्नांना अजागळ उत्तर द्यायची तुझी अपेक्षा आली

आणि स्वतंत्र झालो 


कशातून?

बधिर

आली कैसी बधिरता, या श्रावणाला आजच्या

शुभ्र लोंब्या लागल्या का तांदळाला तिळाच्या


धूर थोडा आग थोडी चांदण्यात कालच्या

रक्त नाही नयनी हे, मातीची छाया दूरच्या


नाही अंगाईत का रे खोट इवली आईच्या

आली कैसी बधिरता, या श्रावणाला आजच्या

Beyond

Beyond me, beyond us

Beyond everything surrounds, thus


Beyond compete, beyond race

Less is more, love more is less


Beyong religion, beyond caste,

Beyond species, the bond to last


Beyond preset, tomorrow and yesterday

Beyond I wish, I reach someday

आशीर्वाद

 चांदीचा वर्ख लावलेला विषाचा पेला

गुबगुबीत उशीखाली उंदीर मेला 

शीतल चांदण्यातून शापित बाण आला

मोरपिसाचा आशीर्वाद तारून नेला 


...अभिमन्यू व्यूहातून सहज बाहेर आला

लुप्त गाव !

 शोधून शोधून शेवटी

एकदाचा सापडलाच तो घाव


खोलात खोलात शिरून

सापडत नाही ज्याचा ठाव


आठवून आठवून सांगतो

कैलासपुर, गंगापूर असच काहीसं त्याचं नाव


लुप्त लुप्त सरस्वतीच्या 

किनारी आहे, तेच माझं गाव

...च्या

 हे विश्व...


...च्या आत, ...च्या बाहेर

...च्या मुळे, ...च्या साठी

...च्या इथे, ...च्या इथून

...च्या कडे.


...च्या लांब, ...च्या जवळ

...च्या पासून, ...च्या पर्यंत

...च्या शिवाय, ...च्या सोबत

...च्या कडून.


..........................संपतं!

मी !

 आकाशात ढग दाटले नव्हते

म्हंजे होते, पण एवढे नाही


वाऱ्याला थंडावा आला नव्हता

म्हंजे होता, पण एवढा नाही


क्षितिजावर लाल रंग झाला नव्हता

म्हणजे होता, पण इतका नाही


एवढ्यात खडाडकन् एक वीज गरजली 

समोरचा पिंपळवृक्ष दुभंगून जमिनीला

स्पर्ष करून पुन्हा आकाशात गेली,


आकाश पुन्हा निरभ्र, वाऱ्याची झुळूक तशीच शांत


मी अवाक्, बघत राहिलो

ते झाड क्षणार्धात कुठे गेलं?

फांद्या, पानं, खोड काही काही शिल्लक नाही

ना पाला, ना कचरा, ना अवशेष, सगळं भस्म


मी भांबावून मोकळ्या रानाकडे पहात राहिलो

आता उन्हातूनच पार करायचं हे रान म्हंजे,

आत्ता ठरवत होतो त्या झाडाखाली सावलीला बसायचं 


इतक्यात मला बासरीचे सूर ऐकू आले

गुरांच्या गळ्यातल्या घंटा, पायातले पैंजण

कोणीतरी हसल्याचा अन् बासरीचा ... आवाज


या सगळ्या चित्रात काहीतरी विचित्र असल्याचा भास झाला 

वीज, आकाश, झाड, बासरी, गवळणी, वारा, पाऊस, ऊन 


यात नसायला हवी अशी गोष्ट एकदाची सापडली .....


मी !