चौक
आयुष्य समृद्ध करणाऱ्या मित्र, गुरू, पुस्तकं, साधना अशा अनेक कलात्मक, गुणात्मक, प्रगल्भ वगैरे गोष्टी आहेत त्यात माझं पामराच आयुष्य समृद्ध करणारी एक साधी सोपी जागा म्हणजे चौक!
कुठलाही, कोणत्याही शहरातला, गावातला, स्टेशन बाहेरचा, एस. टी. स्टँड जवळचा, मंडईतला संध्याकाळी जगबजलेला आणि १२ वाजता सूम् शांत होणारा, हाजी अलीच्या जागतिक कीर्तीच्या चौका पासून ते वरली आळी आणि १० वी गल्ली या निनावी गावातले रस्ते जोडणारा !
कूर्ग ला हत्तींच्या कळपावर रिसर्च करताना नगरहोळ जंगल आणि विराजपेत नावाचं टुमदार खेड यांना जोडणारा फाटा मी जवळपास सहा महिने अनुभवला. त्यात एक कळकट्ट डोसेवाला, एक मिक्सर दुरुस्त करणारं दुकान आणि एक मण्यांची माळा विकणाऱ्या काकुचं टेबल याशिवाय कोणतीही गजबज नसायची. पण, तिथे चालत एक फेरफटका मारल्याशिवाय झोप लागत नसे. आणि चुकून लवकर गेस्ट हाऊस laa पोचलो तर चुटपुट लागायची.
तशीच गाथा कोल्हापूरच्या सम्राट हॉटेल बाहेरच्या चौकाची. २००७ साली तिथे रात्री ११ नंतर कोंडुस्कर च्या २ बसेस निघायच्या, हे सोडून काहीही घडायचं नाही. पण त्यांचा मागमूस ठेवायची जबाबदारी असल्या सारखं आम्ही एक चक्कर टाकून "दादर बस अजून गेली नाही, कमाल आहे" असं म्हणत घरी यायचो.
या सगळ्याची आठवण यायचं कारण मी सध्या अनुभवत असलेला धरमपुर चां चौक! हा एक प्रशस्त, शिमला राष्ट्रीय महामार्गावर चा तिठा. एका बाजूला खोल दरी, दुसऱ्या बाजूला त्यापेक्षा खोल दरी आणि त्या दोन्ही मध्ये असेलल्या एका लहानशा टेकाडावर चढत वसलेलं धरंपुर. पुलंच्या अफजलखानाच्या चित्रा सारखं इथे सगळं आहे... भाजीवाले, टॅक्सीवाले, मेडिकल स्टोअर, बस स्टॉप, रेल्वे स्टेशन, राम मंदिर, गुरुद्वारा, पूल, लांब दिसणारा हिमालय, खाली लांब कधी कधी दिसणारं चंदीगड शहर, दिवे, शेत, कॅफे, ढाबा, ३ स्टार हॉटेल, बँक, आमचा चहावाला पंकज, गरम जिलेबी तळणारा जगदीश, दारूचा ठेका...
पण मला मोबाईलचां चार्जर हवाय तर जायला लागतं २० km लांब सोलन ला !
अशा गमतीदार चौकात काहीही काम नसताना देखील संध्याकाळी एक चक्कर मारल्याशिवाय दिवस सार्थकी लागत नाही. गेले सहा महिने मी इथे सेटल व्हायचं ठरवतो आहे तेव्हा इथे येताना घरातून बाहेरगावी आल्यासारखं वाटायचं. आणि आता इथून जायचं ठरवल्यावर काल पहिल्यांदा इथून येताना बाहेरगावाहून घरी आल्यासारखं वाटलं ! असो, हे मनाचे खेळ माझ्या साठी नवीन नाहीत. अक्षरशः १२ गावातल्या २२ चौकांच्या इमोशनल मगरमिठीतून सुटका करून घेतलेला संताजी आहे मी, मला धारंपुर चां चाय सूत्ता काय थांबवेल?
पण मुद्दा असा आहे की मन मोकळं करायला, समृध्द करायला, शिकवायला, घडवायला आपण ज्याच्याशी खांद्यावर हात टाकून बोलू शकतो, टाळी देऊन हसू खिदळू शकतो असा मित्रच हवा का ?? असे अनेक चौक अनेक स्वरूपात माझ्या जवळ आहेत, ज्यांच्या फक्त असण्याच्या भावनेने मला परिपूर्ण वाटतं, आणि त्यांनी माझ्याशी त्यांच्या मनातलं सांगायची गरज, प्रत्यक्ष भेटण्याची ओढ, शब्दांनीच व्यक्त होण्याची आशा, स्पर्शाने समजून घेण्याची ताकद नसते.
मला मात्र पाँडिचेरी च गांधी statue, शिमल्याच्या RIDGE, साताऱ्याच्या राजवाडा, पुण्यातला लिनाचीम, अगदीच नवीन जन्मलेल्यांसाठी LMD, असे अनेक लाडके, कधी काळी तिथं राहिल्यामुळे रोजच्या जीवनाचा भाग झालेले आणि आपलेसे होऊन आता भूतकाळातल्या आठवणीत फिट्ट जाऊन बसलेले चौक मानवी रुपात जिवलग बनून भेटत राहतात आणि तशाच आपुलकीच्या आणि तटस्थ नात्याने अजुन समृध्द करत राहतात...!